महामानवाचे शिक्षण.......


 विद्येविना मती गेली , मती विना नीती गेली , 

                       नीती विना गती गेली , गतीविना वित्त गेले 

                                    वित्ता विना शूद्र खचले ,  इतके अनर्थ एका अविद्येने केले .......  

 जोतिराव फुले ( १८९ ० ) 

             

                कोलंबिया विद्यापीठातून मास्टर ऑफ आर्ट्स आणि अर्थशास्त्राची डॉक्टरेट : लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्समधून मास्टर ऑफ सायन्स आणि डॉक्टर ऑफ सायन्स इन इकॉनॉमिक्स ; लंडनच्या प्रसिद्ध ग्रेज इन्समध्ये बॅरिस्टर अॅट - लॉ . एखाद्याने एवढ्या मोठ्या पदव्या मिळविणे कदाचित प्रभाव पाडणारे ठरू शकते पण,एखाद्या अस्पृश्य,खेडेगावात जन्मलेल्या , तेही वसाहतीच्या अंमलाखाली असणाऱ्या देशात आणि १९ व्या शतकाच्या शेवटी या गोष्टी म्हणजे असामान्य बाब होती.भीमराव रामजी आंबेडकर यांना भारतातील वंचितांची चळवळ चालविण्यासाठी नेतृत्व करताना या उच्च शिक्षणाची मदत झाली . त्यांच्या या यशामध्ये अनेक योगायोगांनी भरच घातली जसे,ब्रिटिश वसाहतींमध्ये दळणवळणाची मिळालेली मुभा,काही सुधारणावादी आणि दूरदृष्टी असणाऱ्यांची त्यांना मिळालेली मदत,श्रीमंत आणि उच्चवर्णीय समाजसुधारकांची साथ , त्याच्या कुटुंबाचा त्याग आणि त्यांचा स्वतःचा दृढनिश्चय आणि धैर्य . या सर्व गुणांपैकी सर्वाधिक गुण किंवा धैर्यशक्ती त्यांना कुटुंबातूनच प्राप्त झाली होती. 

               भिमाच्या जन्मानंतरच्या काही काळातच त्यांचे सर्व कुटुंब रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीमध्ये स्थलांतरित झाले. रामजी यांना सार्वजनिक खात्यात स्टोअरकीपर म्हणून पद मिळाल्यानंतर ते १८९४ साली साताऱ्याला आले. त्या ठिकाणी भिवा पहिल्यांदा कॅम्प स्कूलमध्ये गेला आणि त्यानंतर १९०० मध्ये सरकारी इंग्लिश मिडियम हायस्कूलमध्ये त्याने प्रवेश घेतला. शाळेत त्याची नोंद भिवा रामजी आंबेडकर अशी झाली. कॅम्प स्कूलमध्ये भिवाचे आंबेडकर नावाचे एक शिक्षक होते.ते ब्राह्मण होते. त्यांनी त्यांच्या दुकानाच्या व्यवस्थापनासाठी शिक्षकाच्या कर्तव्याकडे दुर्लक्ष केले होते, त्यांनी आंबेडकरांच्या बाबतीत मात्र खूपच काळजी घेतली. तल्लख बुद्धीचा भिवा त्यांचा आवडता विद्यार्थी बनला. खूप लांबवरून जेवण आणण्याचे कष्ट पडू नयेत यासाठी ते भिवाला रोजचे जेवण देत असत. त्यांचा आदर ठेवण्यासाठी या मुलाचे आडनाव आंबेडकर असे नोंदविण्यात आले . भविष्यात या शिक्षकाने जेव्हा आंबेडकर जागतिक परिषदेच्या शिष्टमंडळाबरोबर गेले त्यावेळी प्रेमळ आणि भारावलेले पत्र लिहिले होते. ते जेव्हा १९२७ साली एकमेकांना भेटले तेव्हा आंबेडकरांनी त्यांचा आपले गुरू म्हणून सन्मान केला होता. अशाप्रकारे , आधुनिक भारताच्या इतिहासातील एक महनीय नाव हे एका दुर्लक्षित शिक्षकाकडून पण एका सुहृदय व्यक्तीकडून आले होते . 

                  भिवाचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी कोणत्याही शिक्षकापेक्षा अधिक कष्ट भिवाच्या वडिलांनी घेतले .   मी बीए उत्तीर्ण व्हावे यासाठी माझे वडील मोठ्या चिंतेत पडले होते. पहाटेची वेळ शांत आणि अभ्यासासाठी सर्वोत्तम असते. परीक्षेच्या काळात ते मला भल्या पहाटे दोन वाजताच अभ्यासाला उठवत असत. रामजींना स्वतःला इंग्लिश, मराठी आणि मोडी लिपी वाचता येत होती. त्यांच्या मुलाने केवळ उत्तीर्ण न होता , सर्वोत्तम गुणांनी उत्तीर्ण झाले पाहिजे , असा त्यांचा आग्रह होता. भिवाने सुरुवातीला अभ्यासाकडे दुर्लक्ष केले आणि परीक्षांच्या बाबतीत तो काहीअंशी निर्धास्त असे. पण , त्यांचे कुटुंब जेव्हा १९०४ मध्ये मुंबईला आले , त्यावेळी त्याच्यासाठी सर्व प्रकारची पुस्तके उपलब्ध झाली आणि त्याला वाचनाची आवड निर्माण झाली . रामजींनी त्याच्या या आवडीला प्रोत्साहन दिले. लहानपणीच विपुल बुद्धिसंपदा लाभलेल्या आपल्या मुलासाठी त्यांनी आपली मिळकत खर्च केली . भिवाने मागितलेले प्रत्येक पुस्तक ते घेऊन देत. जेव्हा त्यांची पेन्शन संपत असे,तेव्हा ते आपल्या बहिणीकडे जाऊन तिचे दागिने मागून घेत.ते दागिने गहाण ठेवून पुस्तक घेत. पुढची पेन्शन आल्यानंतर ते गहाण ठेवलेले दागिने सोडवून आणत.

                    भिवा आणि त्याच्या भावंडांना सैन्यदलाच्या घरामध्ये असताना अस्पश्यतेचा अनुभव आला नव्हता. मात्र ते जेव्हा साताऱ्याला आले, त्यावेळी प्रथमच त्यांनी जातीय भेदभावाचा अनुभव घेतला. भिवा आणि त्याच्याबरोबरीच्या अन्य अस्पृश्य विद्यार्थ्यांना वेगळे बसण्याची सक्ती करण्यात आली होती. त्यांचे केस कापण्यासाठी न्हावी मिळत नसे. जेव्हा त्याने संस्कृत शिकण्याची इच्छा व्यक्त केली , तेव्हा संस्कृत शिकण्याची अस्पृश्याना मनाई असल्याचे सांगण्यात आले. ते केवळ इंग्लिश आणि पर्शियन यांपैकी एक भाषा निवडू शकत होते . रामजींवर १९०४ साली नोकरी गमावण्याची वेळ आली . त्यामुळे पेन्शनवर ते केवळ दोन मुलांच्या शाळेचा खर्च भागवू शकत होते. त्यामुळे मोठा मुलगा,  बाळाराम यांनी कारखान्यामध्ये नोकरी सुरू केली. भिवाने त्याचे शिक्षण एल्फिन्स्टन हायस्कूलमध्ये सुरू केले . तिथे त्याला फीमध्ये सवलत मिळाली. त्याला कोणीही विद्यार्थी मित्र नव्हते आणि शिक्षकांनी जवळपास त्याच्याकडे दुर्लक्षच केले होते . 

                   भिवाचा बराचसा वेळ जवळच्या उद्यानात वाचनामध्ये जात असे. अशाप्रकारे , या ठिकाणी तासन् तास अभ्यास करण्याचा मात्र एक फायदा झाला. उद्यानाला भेट देण्यासाठी येणारे विल्सन हायस्कूलचे प्रिन्सिपल आणि त्यावेळचे मोठे सुधारणावादी बुद्धिवंत कृष्णा अर्जुनराव केळुसकर यांचे या अभ्यास करणाऱ्या मुलाकडे लक्ष गेले. केळुसकरांनी त्यांची ओळख करून दिली आणि त्यानंतर अनेक वर्षे केळुसकर हे त्यांचे एक मोठे समर्थक राहिले. भिवाला १९०७ मध्ये मॅट्रिकची डिग्री मिळाली. एका अस्पृश्य मुलासाठी ही मोठी कामगिरी होती आणि त्याच्या अभिनंदनासाठी एक कार्यक्रम घेण्यात आला. हा कार्यक्रम ब्राह्मणेतर नेते एस .के. बोले यांनी आयोजित केला होता आणि त्यासाठी केळुसकर उपस्थित होते. कुटुंबाची गरिबी लक्षात घेऊन,केळुसकरांनी बडोदा राज्यातून त्यांना शिष्यवृत्ती मिळवून दिली. बडोदा हे त्यावेळी भारतातील एक मोठे संस्थान होते. त्याचे संस्थानिक सयाजीराव गायकवाड हे त्यावेळचे मराठा सुधारक होते. 

               बाबासाहेबांनी  एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. ते १९१३ मध्ये तेथून इंग्लिश व पर्शियनमध्ये बीए उत्तीर्ण झाले. तिथेही त्यांचा खूपच कमी सहाध्यायशी संपर्क येत असे. दरम्यानच्या काळात येथूनच त्यांचे बालपणीचे नाव मागे पडले आणि आता ते त्यांच्या कॉलेजच्या वार्षिका मधून भीम नावाने ओळखले जाऊ लागले. आंबेडकरांनी १९१३ मध्ये कर्जाची परतफेड करण्यासाठी बडोद्याच्या महाराजांकडे नोकरी करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयामुळे वडिलांशी त्यांचा वाद झाला. त्यांच्या वडिलांना वाटत होते की, त्यांनी मुंबईतील मुक्त वातावरणाचा अनुभव घ्यावा. आंबेडकर त्यांच्या मतावर ठाम राहिले,पण बडोद्याला गेल्यानंतर त्यांना त्याच्या वडिलांचे मतच बरोबर असल्याचे जाणवले कारण ,गुजरातमधील जातिव्यवस्थेबद्दल वडिलांनी सांगितलेली माहिती तंतोतंत खरी होती. आर्य समाजाच्या कार्यालयात झोपण्यासाठी मिळालेल्या एका खोलीपलीकडे त्यांना राहण्यासाठी एकही जागा उपलब्ध नव्हती. जेवणासाठी त्यांना शहरापासून दूरवर असणाऱ्या अस्पृश्यांच्या वस्तीमध्ये जावे लागत होते. तिथे त्यांना समाधानकारक नोकरीही मिळाली नाही . कोणत्याही विभागात त्यांना सामावून घेण्यात येत नव्हते. या विभागातून त्या विभागात त्यांची बदली होत होती आणि कायमस्वरूपी नोकरी त्यांना दिली जात नव्हती . अखेर , वडिलांच्या मृत्यूची बातमी ऐकून ते मुंबईला परतले .    

                बडोद्याला परत जाण्याऐवजी त्यांनी त्यांची व्यथा मुंबईमधूनच महाराजांसमोर मांडली. महाराजा गायकवाड यांनी त्यांना प्रतिसाद देत न्यूयॉर्कमधील कोलंबिया विद्यापीठातील अभ्यासासाठी शिष्यवृत्ती देऊ केली. त्या ठिकाणी जाण्यासाठी त्यांनी अनेक विद्यार्थ्यांना मदत द्यायचे ठरविले होते आणि आंबेडकरांचा इंग्लिशचा सर्वोत्तम अभ्यास व तयारी पाहून महाराजांनी त्यांची या शिष्यवृत्तीसाठी निवड केली. भीमराव जुलै १९१३ मध्ये उच्च शिक्षणाच्या जागतिक केंद्रातील शिक्षणाचा अनुभव घेण्यासाठी निघाले. त्यांनी दहा ते बाराजणांचे कुटुंब आपल्यामागे सोडले होते आणि त्या सर्वांची गुजराण एकट्या बाळारामच्या मिळकतीवर सुरू होती आणि बाळाराम हे त्यावेळी कामगार होते. न्यूयॉर्कमध्ये भीमराव मोकळेपणाचा आणि मुक्त विचारांचा अनुभव घेत होते. 

                     कोलंबियामध्ये त्यांनी सामाजिक शाखांचा , प्राधान्याने अर्थशास्त्राचा अभ्यास केला , ते अमेरिकेतील प्रसिद्ध तत्त्वचिंतक जॉन डेवे यांचे विद्यार्थी होते. अर्थतज्ज्ञ प्रा.एडवर्ड सेलिग्मन यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी १९१५ साली एम . ए . पूर्ण केले आणि १९१६ साली पीएच.डी.चा प्रबंध सादर केला. कोलंबियातील पदवीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी १९१६ मध्ये लंडनला जाण्याचा निर्णय घेतला. त्यांना बॅरिस्टर ची डिग्री घ्यायची होती, आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होण्यासाठी ते आवश्यक होते . शिवाय आंबेडकरांना शिक्षणाची आवड असल्याने त्यांनी अर्थशास्त्राची पदवी घेण्यासाठीही प्रस्ताव सादर केला होता . त्यांची बडोदा शिष्यवृत्ती संपली होती आणि दिवाणांनी आणखी दोन वर्षे शिष्यवृत्ती बाढवून देण्यास नकार दिला , त्यामुळे आंबेडकरानी स्वतःच त्याबाबत महाराजांकडे अर्ज केला. त्याला प्रतिसाद येण्यापूर्वीच ते लंडनला रवाना झाले . खिशामध्ये काही पैसे नसताना तिथे उतरले. तिकीट नसताना त्यांनी ट्रेनने प्रवास केला आणि त्यांच्याबरोबर राहणाऱ्या व्यक्तीने त्यांच्या मोटारीचे , सामानाचे भाडे दिले . दोन दिवसांनंतर त्यांना शिष्यवृत्ती एक वर्षान वाढविण्यात आल्याचे पत्र मिळाले. त्यांनी लगेच  बॅरिस्टर अॅट लॉ डिग्रीसाठी आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अंड पॉलिटिकल सायन्समध्ये एमएस्सी ( अर्थशाखा ) आणि अर्थशास्त्र विषयामध्येच डॉक्टरेटसाठी नावनोंदणी केली. वर्षभरातच त्यांनी ' भारतीय अर्थशास्त्राचे प्रांतीय विकेंद्रीकरण 'या विषयावरील शोधनिबंधाचा आराखडा तयार केला. मात्र त्यांना शिष्यवृत्ती वाढवून देण्यास नकार देण्यात आला . नाईलाजाने त्यांना भारतात परत यावे लागले . 

                परदेशातील पहिल्याच वास्तव्यात प्रकाशित होण्यासारख्या दोन पुस्तकांचे लेखन त्यांनी  पूर्ण केले होते. त्यापैकी एक १९९६ साली कोलंबिया विद्यापीठातील सेमिनारसाठी लिहिलेला ' भारतातील जाती : त्यांची यंत्रणा , उत्पत्ती आणि विकास हा निबंध होता, तो इंडियन जर्नल ऑफ अँटिक्विटीमध्ये प्रकाशित झाला होता. दुसरा सर्वात मोठा प्रकल्प त्यांनी आपल्या अर्थशास्त्राच्या पीएच . डी साठी प्रबंध म्हणून पूर्ण केला होता. ' ब्रिटिश इंडियातील अर्थशास्त्राचे प्रांतीय विकेंद्रीकरण ' हा प्रबंध १९२७ साली प्रकाशित झाला . 

    मुंबई,न्यूयॉर्क,लंडन येथील शिक्षणामुळे आंबेडकरांनी जगातील सामाजिक आणि आर्थिक विचारांच्या खजिन्यामध्ये प्रवेश मिळविला. देशातील राष्ट्रवादी म्हणविल्या जाणान्या उच्चभ्रू नेत्यांच्या वर्तुळातील काहीजणांकडे शिष्यवृत्तीचा तुकडाही नव्हता , मग त्यांच्या पदव्यांचा उल्लेख करणेही दूरच , आंबेडकरांनी त्यांच्या अभ्यासाचा उपयोग स्वतःच्या उत्कर्षासाठी केला नाही तर भारतातील अस्पृश्य , वंचितांच्या लढ्यासाठी केला .गरिबीच्या अर्थानेही त्यांच्या शिक्षणाचे वेगळे महत्त्व होते. त्यांचा जगण्याचा संघर्ष अगदी कमी वयात सुरू झाला. आंबेडकर आणि कुटुंबीयांचे जीवनही अन्य सर्वसामान्य भारतीयांप्रमाणेच होते आणि सरासरी जीवनमान त्यावेळी वीसपर्यंतच होते. चौदा मुलांना जन्म देणाऱ्या ( त्यातील फक्त सात जगू शकली ) त्यांच्या आईचा अकाली झालेला मृत्यू , कुटुंबांची व्यवस्था पाहणाऱ्या त्यांच्या कामगार असणाऱ्या मोठ्या भावाचा मृत्यू , त्यांच्या स्वतःच्या पाचपैकी चार अपत्यांचा मृत्यू - हे सर्व केवळ रोगांचा परिणाम नव्हता तर त्यावेळचे जीवनमान , कुपोषण , लोकांची झालेली गर्दी आणि स्वच्छतेचा अभाव यांचाही परिणाम होता . हा उच्चभ्रू राष्ट्रवादींपेक्षा वेगळा अनुभव होता .

                   गांधींनी कदाचित एक व्रत म्हणून रेल्वेच्या तिसऱ्या वर्गातील डब्याने प्रवास केला असेल , पण आंबेडकरांसाठी मात्र ती गरज होती. नेहरू आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी शासकीय नोकऱ्या आणि सरकारी संस्थांशी असणारा संबंध यांचा त्याग केला असेल , कारण त्यांची सांपत्तिक स्थिती चांगली होती आणि त्यांचे जमीनदार कुटुंबीय त्यांच्या नातेवाईकांना सांभाळण्यास समर्थ होते. मात्र हीन समजल्या गेलेल्या जातींमधील लोक आणि गरिबीची पार्श्वभूमी असलेल्या आंबेडकरांसारख्यांना ते परवडणारे नव्हते. कारण तेच त्यांच्या कुटुंबांसाठी एकमेव आधार होते. 

               मध्यमवर्गाची व्याख्या त्यावेळी आणि आजही दलितांच्या बाबतीत वेगळी आहे . शेवटी, जात हा एक व्यापक अनुभव आहे. वसाहतवादाने निर्माण केलेल्या मानवी जीवनाचे अवमूल्यन, वैयक्तिक हक्कांचे उल्लंघन आणि सामाजिक अभिसरणातून झालेली हकालपट्टी याबाबत खूप काही लिहिले गेले आहे . आंबेडकरांनी स्वतः एक वसाहतीच्या काळातील भारतीय म्हणून भेदभावाचा अनुभव घेतला होता आणि तरीही त्यांनी स्वतःची देशाविषयीची निष्ठा व्यक्त केली होती . पण ते सर्व अस्पृश्यतेच्या अनुभवांपेक्षा खूपच कमी होते . कदाचित , अशीही शक्यता आहे की , सैन्यदलाची पार्श्वभूमी लाभल्यामुळे अन्य दलितांपेक्षा मानसिक मानहानीचे अनुभव त्यांना कमी आले असतील . त्यांचे वडील आणि आई दोघांनाही सैन्यदलाची पार्श्वभूमी होती आणि त्यामुळे पारंपरिक ग्रामव्यवस्थेमध्ये त्यांची खालच्या जातींच्या अवहेलनेसारख्या  गोष्टींपासून सुटका झाली असेल. नक्कीच , त्यांनी आंबेडकरांच्या कुटुंबीयांनी त्यांच्या मुलामध्ये महत्त्वाकांक्षा आणि आत्मविश्वास रुजविला असेल , पण जेव्हा त्यांचे कुटुंब साताऱ्याच्या मिश्र समाजामध्ये स्थलांतरित झाले , तेव्हा मात्र भेदभावाचा अनुभव सुरू झाला . टोकाचा भेदभाव इतरांपासून वेगळे बसायला लावणे , त्यांना पाहिजे असणाऱ्या अभ्यासक्रमाला प्रवेश न देणे , अन्य विद्यार्थ्यांकडून वाळीत टाकणे आणि बडोद्यासारख्या शहरात राहण्यासाठी जागा मिळू नये आणि सन्मानाने कामही करता येऊ नये हा सर्व भाग एक आक्रोश , प्रक्षोभ म्हणून अनुभवला गेला होता , तो ' विधिलिखित ' तर कधीच नव्हता . आंबेडकरांना हे समजून चुकले होते की , जातीय भेदभावाची पाळंमुळं खूप खोलवर गेलेली आहेत , ती व्यापक आहेत. त्याविषयींचे पूर्वग्रह अगदी तळातील गावातून ते शहरातील झोपडपट्ट्यांपासून ते भारतीय जीवनातील सुसंस्कृत, अभिजन वर्गातील मानल्या जाणाऱ्या भागापर्यंत पसरला आहे . त्यातून आर्थिक शोषण आणि वैयक्तिक मानहानीच होणार आहे हे स्पष्ट होते. परंतु अस्पृश्यता आणि ती निर्माण करणारी सांस्कृतिक - धार्मिक व्यवस्था हीच त्यांच्या जीवनाची परिभाषा बनली आणि त्याचे निर्दालन करणे हा त्यांच्या जीवनक्रमाचा अविभाज्य भाग झाला .

बाबासाहेबांनी मिळवलेल्या शैक्षणिक पदव्या.....

  1. Elementary Education, 1902 Satara, Maharashtra
  2. Matriculation, 1907, Elphinstone High School, Bombay Persian, etc.,
  3. Inter 1909, Elphinstone College, Bombay-Persian and English
  4. B.A, 1913, Elphinstone College, Bombay, University of Bombay, Economics & Political Science
  5. M.A, 1915 Majoring in Economics with Sociology, History Philosophy, Anthropology, and Politics
  6. Ph.D., 1917, Columbia University conferred a Degree of Ph.D.
  7. M. Sc 1921 June, London School of Economics, London. Thesis – ‘Provincial Decentralization of Imperial Finance in British India’
  8. Barrister-at- Law 30-9-1920 Gray’s Inn, London
  9. (1922-23, Spent some time reading economics in the University of Bonn in Germany.)
  10. D. SC Nov 1923, London School of Economics, London ‘The Problem of the Rupee – Its origin and its solution’ was accepted for the degree in Economics
  11. L.L.D (Honoris Causa) 5-6-1952 Columbia University, New York For his achievements, Leadership and authoring the constitution of India
  12. D.Litt (Honoris Causa) 12-1-1953 Osmania University, Hyderabad For his achievements, Leadership, and writing the 

भास्कर गायकवाड

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.